सोलापूरचे गायक मोहम्मद अयाज यांना ‘भारत भूषण’ राष्ट्रीय पुरस्कार.

प्रतिनिधी -सोलापूर 
सोलापूरचे सुप्रसिद्ध गायक, ‘सूरमणी’ तसेच ‘महाराष्ट्राचे महागायक’ स्पर्धेचे विजेते मोहम्मद अयाज यांना नुकताच प्रतिष्ठेचा ‘भारत भूषण’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. मुंबई येथील मेयर सभागृहात आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये मोहम्मद अयाज यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला.
प्रबळ इच्छाशक्ती, अथक परिश्रम आणि कलेप्रती असलेली निष्ठा यांच्या बळावर मोहम्मद अयाज यांनी आपल्या गायनाचा ठसा देश-विदेशात उमटवला आहे. मंद्रूपसारख्या ग्रामीण भागातून प्रवास सुरू करून त्यांनी मलेशिया, सिंगापूर, दुबई, आफ्रिका, सौदी अरेबिया आदी देशांमध्ये आपल्या सुरेल गायनाने रसिकांची मने जिंकली आहेत.त्यांच्या यशामुळे सोलापूरचे नाव सांस्कृतिक क्षेत्रात गौरवाने घेतले जात आहे.
मोहम्मद अयाज यांनी सिद्धरामेश्वर भजन, आई तुळजाभवानीचा गोंधळ, स्वामी समर्थ महिमा, देशभक्तीपर गीते तसेच छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महापुरुषांवर आधारित अनेक ध्वनिचित्रफितींमधून आपली कलासेवा दिली आहे. आपल्या सुरेल आवाजाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे अयाज हे एकलव्य गायक म्हणून ओळखले जातात.शेतकरी कुटुंबातून आलेल्या या कलावंताने शून्यातून विश्व निर्माण करत यशाचे शिखर गाठले आहे. ‘भारत भूषण’ राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना मोहम्मद अयाज यांनी, “हा पुरस्कार केवळ माझा नसून माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व रसिक मायबापांचा आहे. हा सन्मान मी सर्व सोलापूरकरांना समर्पित करतो,” अशी भावना व्यक्त केली.
मोहम्मद अयाज यांच्या या यशाबद्दल सोलापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, कलाकार आणि चाहत्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
------------------------------------------
🔹जनता संघर्ष न्यूज, सोलापूर 
🔹संपादक -सिद्धार्थ भडकुंबे 
🔹बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240


Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.