संविधानाच्या संरक्षणासाठी लोकलढा उभारण्याची गरज – पाटील

सोलापूर : प्रतिनिधी
संविधान हा देशाचा आत्मा असून त्याच्या संरक्षणासाठी लोकलढा उभारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शंकर पाटील यांनी केले. धर्मकेंद्रित राजकारणामुळे संविधानिक मूल्यांना धोका निर्माण होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन समितीच्या वतीने महात्मा जोतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त वसुंधरा महाविद्यालयात आयोजित प्रबोधन व्याख्यानमालेत ते बोलत होते. ‘जातविरहित समाजव्यवस्थेची संकल्पना : महात्मा बसवण्णा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान’ या विषयावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.महात्मा बसवण्णा यांनी १२ व्या शतकात समतेचा संदेश देत श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली. “कायकवे कैलास” या तत्त्वज्ञानातून श्रमाधिष्ठित जीवनपद्धतीचा पुरस्कार केला. मात्र आजच्या काळात कर्मकांडांचे उदात्तीकरण वाढत असून, कामापेक्षा पूजा महत्त्वाची मानणारी प्रवृत्ती बळावत असल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली.
शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या पक्षांनी धर्मनिरपेक्ष भूमिकेशी तडजोड केल्याचेही त्यांनी नमूद केले. गांधीवादी विचारांचा पुरस्कार करणारे काही घटक विरोधी विचारसरणीशी सहज मिसळताना दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.व्याख्यानमालेचे उद्घाटन ज्येष्ठ नेते तथा शाहू परिवाराचे प्रमुख प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी विवेकानंद प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अंबादास पांढरे होते.
प्रास्ताविक प्रा. एम. आर. कांबळे यांनी केले. सोलापूर शहराचा विस्तार लक्षात घेऊन जुळे सोलापूर परिसरात वैचारिक गरजा पूर्ण करण्यासाठी तीन दिवसीय प्रबोधन व्याख्यानमाला आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.
संविधानाच्या प्रस्ताविकेच्या वाचनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संयोजन समितीचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड, नामदेव पवार, प्रशांत बाबर, ज्येष्ठ विधीज्ञ मेत्रस, राजू मानकर यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुढील व्याख्यान
रविवार, १२ एप्रिल २०२६ रोजी
विषय : डॉ. आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून संविधानिक आरक्षण आणि न्यायालयाची भूमिका
वक्ते : प्रा. डॉ. विजय माकणीकर, शिवाजी विधी महाविद्यालय, परभणी
अध्यक्ष : निजामुद्दिन शेख, भारतीय संविधान अभ्यासक, सोलापूर

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.